अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू   

इटानगर : अरुणाचल प्रदेशात पूर आणि दरड दुर्घटनेत नऊजणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याला पावसाने झोडपून काढले असून अनेक भागांत पूर आला असून दरडी कोसळ्ण्याच्या घटना घडल्या आहेत.
 
दरड कोसळल्यानंतर एक वाहन घसरून दोन कुटुंबातील सात सदस्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री राष्ट्रीय महामार्गा १३ वर पूर्व कामेंग जिल्ह्यातील बानासेपा परिसरात दुर्घटना घडली होती. मुसळधार पावसाने दरड थेट मार्गावर कोसळली होती. सर्व जण किटचांग गावचे रहिवासी होते. सर्व जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, सुबनसारी जिल्ह्यात दोन मजुरांचा मृत्यू तर दोन जणांची सुटका दरडी खालून करण्यात आली. झिरो -कामले मार्गावर एका शेताकडेच्या डोंगराळ भागातून दरड कोसळली होती. त्यात चौघे मजूर अडकले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले.
 
आसाममध्ये पाच जणांचा मृत्यू 
 
गुवाहाटी : आसामच्या सहा जिल्ह्यांत पुराचे तांडव सुरू आहे.  गेल्या २४ तासांत दरडी कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. दहा हजारांवर नागरिकांना पुराचा फटका बसल्याची माहिती शनिवारी अधिकार्‍यांनी दिली.
 
आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, कामरुप जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला. शहर व्यवहार मंत्री जयंत माला बरुहा यांनी शुक्रवारी सांगितले की, गुवाहाटीजवळ बोंडा परिसरात दरड कोसळून तीन महिलांचा मृत्यू झाला. पूरग्रस्त भागांत विविध संस्थांच्या माध्यमातून मदतकार्य वेगाने राबविले जात आहे. आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सागितले की, कामरूप मेट्रोपोलिटन, कामरुप आणि काचर जिल्ह्यातील पाच महसुली क्षेत्रांत पूर आला आहे. एकूण १० हजार ५०० नागरिकांना पुराचा फटका बसला. तेथे निर्वासितांच्या दोन छावण्या उभारल्या आहेत. एका ठिकाणी मदत वितरण केंद्र सुरू केले आहे. शहरी भागांतील  धेमाजी, लखीमपूर आणि गोलघाट जिल्ह्यात आठ महसुली क्षेत्रात पूर आला आहे. सुमारे २ हजार नागरिकांना फटका बसला आहे. तेथे छावणी अथवा मदत वितरण केंद्रे कार्यरत नाहीत. उत्तर लखीमपूर महसुली क्षेत्रातील बांध फुटला. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया पथके पुरात अडकलेल्यांची सुटका करत आहेत. 

Related Articles